सोलापूर - रेल्वे खासगीकरणच्या विरोधात माजी आमदार नरसैया आडम यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करण्यासाठी परवानगी नसल्याने आडम यांच्यासह सिटूच्या १३८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी बोलताना सोन्याची अंडी देणाऱ्या रेल्वेचे खासगीकरण हाणून पाडा, असे आवाहन कॉ. नरसैया आडम यांनी केले आहे.
भारत सरकारने १०९ रेल्वेमार्गावर १५१ खासगी रेल्वे गाड्या चालवण्यासाठी देशी-विदेशी खाजगी कंपन्यांना निमंत्रित केले आहे. यापूर्वीच सरकारने रेल्वे इंजिन व बोगीचे उत्पादन, इलेक्ट्रिकल आणि सिग्नलचे काम व मालवाहतूक मार्ग यामध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मुभा दिली आहे. आता क व ड गटाची रिक्त असलेली ५० टक्के पदे रद्द करण्याचा व नवीन पदनिर्मिती वर प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार ४०० रेल्वे स्टेशनचे जमिनीसह खासगीकरण करणार आहे. रेल्वे डबे कारखाना व इंजिन कारखाना खासगीकरण करून त्याला वेगळे करून शेअर्स मार्केटमध्ये त्याचे शेअर्स ठेवणार आणि त्याचे खासगी कंपनीत रुपांतर करणार. खरे पाहता रेल्वे तिकीट दरामध्ये ४७ टक्के अनुदान आहे. या रेल्वेमधून दरवर्षी सरकारला मोठा महसूल मिळतो.
भारतीय अर्थ व्यवस्थेची रक्तवाहिनी असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रामधील अत्यंत महत्त्वाचे व स्वतंत्र अर्थसंकल्प असलेले रेल्वे खाते सरकार या देशातील करबुडव्या, दिवाळखोर नफेखोर भांडवलदारांना रेल्वेचे खासगीकरण करून आंदण म्हणून देण्याचा घाट घातलेला आहे, असा आरोप करत आडम यांनी रेल्वे खासगीकरण रद्द करण्याची मागणी केली आहे. वास्तविक पाहता रेल्वे म्हणजे देशाच्या अर्थ व्यवस्थेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. सरकार अंडी विकण्याऐवजी कोंबडीच विकायला निघाले. म्हणजेच पुन्हा देश गुलामीकडे नेण्याचे द्योतक असल्याची टीका त्यांनी केली.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)च्यावतीने आज सार्वत्रिक देशव्यापी संपाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापूर येथे आडम यांच्या मार्गदर्शनात व सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळा येथे सकाळी ११ वाजता रेल्वे खासगीकरण रद्द करा, क व ड वर्गातील ५० टक्के रिक्त पदे रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या आणि १ लाख २५ हजार रिक्त पदे तातडीने भरा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.