सिंधुदुर्ग - जीवावर बेतणारी संकटं माणसाला जगण्याचा नवा मार्ग दाखवतात. या संकटात मग माणूस आपापसातले वैर विसरून एकमेकांच्या मदतीला धावतो. असाच काहीसा अनुभव सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील आचरा पारवाडी, डोंगरेवाडी येथे आला. या ठिकाणी असलेल्या कोळंबी संवर्धन प्रकल्पाला काही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. मात्र, असे असताना जेव्हा चक्रीवादळामुळे या प्रकल्पात काम करणारे कामगार येथे अडकून पडले. तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी प्रकल्प विरोधी गट पुढे आला. यातून माणुसकीचे दर्शन घडवत या लोकांनी प्रकल्पात अडकलेल्या लोकांना वाचवले. याचा व्हिडिओही समोर आला आहे.
प्रकल्प विरोधी गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडेही झाल्या तक्रारी
कितीही मोठे वैर असले तरी संकट काळात वैर बाजूला ठेवून मदतीला धावून जाणे, हीच खरी माणूसकी. याचा प्रत्यय रविवारी (16 मे) दुपारी तौक्ते वादळाने उडालेल्या हाहाकारात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील आचरा पारवाडी, डोंगरेवाडी येथे कोळंबी प्रकल्प आहे. यामुळे या भागातील जमिन, विहीरींचे पाणी क्षारयुक्त होण्याबरोबरच पूरस्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या भागातून प्रकल्पाला जोरदार विरोध केला जात आहे. याबाबत प्रकल्प विरोधी समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तक्रारी दाखल करून दाद मागण्यात आली आहे.
कामगारांना वाचवायला प्रकल्प विरोधकच सरसावले
रविवारी तौक्ते वादळामुळे उधाणाचे पाणी या प्रकल्पात अकस्मात शिरले. त्यामुळे प्रकल्पाचे कामगार यात अडकले. हे समजताच प्रकल्प विरोधी समितीचे रवींद्र बागवे, अर्जुन दुखंडे, सचिन बागवे, गौरव राणे, महेंद्र राणे, ओंकार बागवे, प्रतूल आचरेकर, शैलेश राणे, संतोष राणे, अशोक आचरेकर, विजय दुखंडे आणि लिकेश आचरेकर यांनी धाव घेतली. त्यांनी जिवावर उदार होऊन प्रकल्पात अडकलेले मँनेजर फारुख, कर्मचारी देवेंद्र राणे, संतोष धुरी आणि 2 श्वानांना बाहेर काढले. आपले वैर प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीशी आहे. काम करणाऱ्या लोकांशी नाही. असा प्रत्यय देत प्रकल्प विरोधी लोकांनी दाखवलेल्या माणूसकीतून 3 लोकांना धोकादायक स्थितीतून बाहेर काढले गेले. त्यांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई किनारपट्टीची दृश्य