सातारा - पिंप्रद (ता. फलटण) येथे जमिनीच्या वादातून पारधी समाजातील महिलेला वादग्रस्त जागेतील झोपडीसह जाळल्याचा भीषण प्रकार घडला आहे. यामध्ये संबंधित जळीत महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली.
याबाबत कल्पना अशोक पवार (वय 45, रा.अलगुडेवाडी, ता.फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पवार यांचे सासरे झबझब पवार यांनी सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वी पिंप्रद येथे प्रल्हाद मोरे यांची 25 गुंठे जमीन खरेदी केली होती. मात्र, ही जमीन प्रल्हाद मोरे व त्यांचे नातेवाईक तक्रारदाराच्या कुटुंबाला वहिवाटू देत नव्हते. त्या जागेचा दोन्ही कुटुंबात वाद होता.
संशयितांनी पेटवली झोपडी
कल्पना पवार, त्यांची मुलगी रोशनी, काजल, सून मातोश्री, नणंद महुली उर्फ मौली यांनी पुन्हा झोपडी उभारली व मुक्काम केला. रात्री 11 च्या सुमारास कुंडलिक कृष्णा भगत, सतिश भगत, राजू प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे आणि सुनिल मोरे या पाच जणांनी हातात दांडगे घेऊन तक्रारदार व सोबतच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला. त्यावेळी महुली उर्फ मौली या झोपडीमध्ये झोपल्या होत्या. संशयितांनी झोपडी पेटवून दिली. त्या झोपडीत झोपलेल्या महुली उर्फ मौली यांचा भाजून जागीच मृत्यू झाला.
चौघांना कोठडी
संशयितांनी कल्पना पवार, सूत मातेश्री यांनाही मारहाण करून जखमी केले. याबाबत पोलिसांनी खून व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी कुंडलिक कृष्णा भगत, सतिश भगत, राजू प्रल्हाद मोरे व कुमार मच्छिंद्र मोरे या चौघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.