सातारा - किल्ले अजिंक्यताऱ्यावर अपुरी जागा आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी किल्ल्याच्या पायथ्याला राजधानी आणली. तेच शाहूनगरी पुढे सातारा शहर म्हणून नावारुपास आले. देशातील या पहिल्या सुनियोजित शहराला २०२० मध्ये ३०० वर्षे पुर्ण होत आहेत. मात्र, या निमित्ताने कोठे उपक्रम नाहीत की, त्याचा साधा उल्लेखही नाही. सातारकरांना आपल्या शहराच्या त्रिशताब्दी महोत्सवाचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे.
छत्रपती शाहूराजे (थोरले) भोसले यांचा १८ मे १६८२ ला रायगड जिल्ह्यात माणगाव येथे त्यांच्या अजोळी जन्म झाला. जानेवारी १७०७ ते डिसेंबर १७४९ हा त्यांचा कार्यकाळ आहे. १५ डिसेंबर १७४९ रोजी साता-यात छत्रपती शाहूंचे निधन झाले. संगम माहुली येथे कृष्णा-वेण्णेच्या संगमावर शाहू महाराज यांची समाधी आहे.
साता-याची उभारणी -
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार शाहूंच्या काळात झाला. मराठा स्वराज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आली. डिसेंबर १७२० मध्ये श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्ल्यावर शाहू महाराजांची भेट घेतली. त्यानंतर १७२१ च्या मध्यात किल्ल्याच्या पायथ्याला सातारा राजधानीतून शाहूंचे कामकाज चालल्याचे दाखले पेशव्यांबरोबरच्या पत्रव्यवहारात सापडतात. म्हणजे हाच काळ सातारा शहराच्या उभारणीचा काळ समजला जातो. पाण्याचे दुर्भिक्ष व अपुरी जागा यामुळे शाहूंनी राजधानी पायथ्याला आणल्याचा उल्लेख आढळतो.
भारतातील पहिले सुनियोजित शहर -
शाहूनगरलाच सातारा शहर म्हटले जाऊ लागले. शाहू महाराजांनी स्वतःसाठी दोन राजवाडे बांधले. यवतेश्वरच्या डोंगरातून शहरात पाणी आणले. हौद व तलाव बांधले. शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या निगराणीखाली पुष्कळ वाढली. व्यापार-उद्योगाचाही विस्तार झाला. पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद, अशा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली. सध्या शाहू उद्यान आहे त्याठिकाणीच शाहू महाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणून त्याला तख्ताचा वाडा म्हणतात.
त्रिशताब्दी महोत्सवाचे विस्मरण -
मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला तो छत्रपती शाहूंच्या कार्यकाळात. १७२० ते १७२१ हा सातारा शहराच्या उभारणीचा काळ समजला जातो. सातारा शहराचे त्रिशताब्दी वर्ष सुरू आहे. मात्र, दुर्दैवाने सातारकरांच्या लेखी याची नोंदचं नाही. त्रिशताब्दीनिमित्त कोणताही कार्यक्रम झाला नाही. सातारकरांना दुर्दैवाने आपल्या गावाला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत, याचे विस्मरण झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२७० वर्षांची मूळ समाधी अद्यापही मजबूत -
छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे मूळस्थान कृष्णा नदीच्या पात्रात नऊ फूट खोल आहे. या समाधीचे मूळ बांधकाम करणाऱ्या तत्कालीन स्थापत्य अभियंत्याने समाधीचा पाया 9 इंच लांब आणि तितकाच रूंद अशा शिसवाच्या चौकटीवर केला आहे. गेल्या २७० वर्षांत मूळ समाधीला जराही धक्का लागलेला नाही. या शिसवी चौकटीपासून पाच फुटांपर्यंत मजबुतीकरण करण्यात आले आहे. समाधी स्थानाचा चबुतरा हा ११ फूट लांब आणि ११ फूट रुंद आहे. पूर्ण बांधकाम हे २२ फूट उंच आहे. विशेष म्हणजे या समाधीचे पुनर्निमाण सुरू असताना २०१९ साली सलग तीन दिवस ही समाधी पाण्याखाली गेली होती. २०२० साली अर्धे बांधकाम पुराच्या पाण्याखाली होते. महापुराच्या पाण्याचा काहीही परिणाम या समाधीवर झाला नाही. समाधीचे छत छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर येथील समाधी सारखेच करण्यात आले आहे.