सातारा - रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले विज्ञान शिक्षक डॉ. सुधीर कुंभार हे गेल्या 24 वर्षांपासून दर आठवड्याला सातत्याने 'निसर्गज्ञान' हे साप्ताहिक भित्तीपत्रक प्रकाशित करत आहेत. त्यांच्या भित्तीपत्रकाने १ हजार साप्ताहिक अंकाचा टप्पा पार केला आहे. त्यांच्या या निसर्ग प्रबोधनाच्या चळवळीची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'ने नोंद घेतली आहे.
हेही वाचा - संभाजीराजेंची गाडी पाहताच शिवेंद्रसिंहराजेंनी ओव्हरटेक करून घेतली भेट
जैवविविधतेच्या संरक्षण व संवर्धनासाठी कायमस्वरुपी आणि भरीव कामगिरी करण्याच्या उद्देशाने डॉ. कुंभार हे वर्षभर सतत उपक्रम राबवितात. त्याची दखल विविध स्तरावर घेण्यात आली आहे. निसर्गज्ञान या भित्तीपत्रकाचा पहिला अंक ७ जानेवारी १९९८ ला प्रकाशित झाला. तेव्हापासून दर आठवड्याला भित्तीपत्रक प्रसिद्ध होत आहे. निसर्गाच्या साखळीतील महत्वपूर्ण घटक असणार्या वनस्पती, पशू, पक्षी, किटक, फुलपाखरे, सरपटणाऱ्या प्राण्यांची उपयुक्तता, वैशिष्ट्ये आणि त्यांची शास्त्रीय माहिती सांगणारे भित्तीपत्रक डॉ. सुधीर कुंभार दर आठवड्याला प्रकाशित करतात.
निसर्गज्ञान भित्तीपत्रकाचे वर्षभर प्रदर्शन - लोकांचे प्रबोधन व्हावे म्हणून साप्ताहिक निसर्गज्ञान भित्तीपत्रकाचे प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, एनएसएस कॅम्प, वन विभागाच्या कॅम्पमध्ये वर्षभर प्रदर्शन आयोजित केले जाते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांनी मागणी केल्यास सण, उत्सवात देखील भित्तीपत्रकाचे प्रदर्शन आयोजित करण्याची डॉ. सुधीर कुंभार यांची संकल्पना आहे. भित्तीपत्रक प्रदर्शन हे सर्वांसाठी खुले असते. या भित्तीपत्रकामध्ये झाडे, फळे, फुले, वन्यप्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, किटकांबद्दलची माहिती, निसर्गातील त्यांचे महत्व देखील नमूद केले जाते. वृक्षतोडीमुळे पक्षी, वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ लागला आहे. त्यामुळे, वृक्षारोपणाइतकेच संगोपन आणि संवर्धन करण्याचे महत्त्व डॉ. कुंभार निसर्गज्ञान भित्तीपत्रकाच्या माध्यमातून समाजापुढे मांडतात.
पर्यावरण वाचविण्याची कृती व्हावी - निसर्गाबद्दल जागृत होऊन काम करणे आवश्यक आहे. निसर्ग, पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न आपण आपल्या पातळीवर करू शकतो. कोणत्याही वयाचा माणूस असला तरी त्याला निसर्ग ज्ञान असणे महत्वाचे आहे. आपल्या हातून निसर्ग वाचवण्याची कृती झाली पाहिजे. यासाठीच्या प्रबोधनासाठीच भित्तीपत्रकाची संकल्पान सुरू केली. एखाद्या विषयावर एकाच व्यक्तीने केलेले हे भित्तीपत्रक असल्याने लिम्का बुकने निसर्गज्ञान या भित्तीपत्रकाची नोंद घेतली असल्याचे डॉ. सुधीर कुंभार यांनी सांगितले.
नदीकाठच्या मातीचा उपसा पर्यावरणासाठी धोकादायक - वीटभट्टीसाठी लागणार्या तांबड्या मातीसाठी नदीकाठी बेसुमार उपसा होत आहे. यामुळे नद्यांचे पात्र बदलले जात आहे. नद्यांना पूर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात मातीची धूप होते. झाडाच्या बुडख्याची माती वाहून गेल्यामुळे वृक्ष उन्मळून पडतात. यामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. परंतु, प्रशासन बेसुमार माती, वाळू उपशाकडे दुर्लक्ष करत असल्याने हिरवे नदीकाठ आता भकास झाले आहेत. पर्यावरण विभागाने माती, वाळू उपशावर निर्बंध आणले तरच पर्यावरणाच्या र्हासाला आळा बसू शकेल. त्यामुळे, प्रशासनाने माती, वाळू उपशावर कायमस्वरुपी बंदी आणावी, अशी मागणी डॉ. कुंभार यांनी केली आहे. जैवविविधता जपायला, पर्यावरण पूरक गोष्टी करायला प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केली तरच पर्यावरणाचा समतोल वाढेल, असेही डॉ. कुंभार म्हणाले.
हेही वाचा - कोयना धरणाच्या पाणी वाटप कराराच्या तांत्रिक वर्षाचा आज शेवटचा दिवस! २० टीएमसी पाणीसाठा शिल्लक