सातारा - दुष्काळी भागात सरकारने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. मात्र, अनेक चारा छावण्यांमध्ये चारा उपलब्ध करून दिला जात नाही. तर अनेक ठिकणी पशु खाद्य देखील वेळेवरती दिले जात नाही. सरकारने ठरवून दिलेल्या १८ किलो चारा न देता दहा किलो, आठ किलो चारा देवून चाराचोरी केली जात आहे. मुक्या जनावरांच्या खाद्यावरही छावणी चालक डल्ला मारत असताना ही छावण्या तपासण्याचे नाटक प्रशासन कशासाठी करते..?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास टाळाटाळ करुन त्याची पाठराखण तर करत नाहीना, असा सवाल उपस्थित होत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र, त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवून छावणी चालकांची पाठ राखण करत असल्याचा आरोप छावणीत असणारे शेतकरी करत आहेत. मात्र, यावर लेखी तक्रार तसेच माहिती देणाऱ्या शेतकरी वर्गला चारा छावणी चालक चार देण्यास टाळाटाळ करतात. तसेच शेतकरी वर्गला दमदाटी करत असल्याचे प्रकार देखील घडत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
छावण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. ते सुरु आहेत का..? यांची शहानिशा करुन जर सीसीसीटीव्ही बसवून देखील असे प्रकार होत असतील, तर हे प्रशासनाच्या लक्षात येत नसेल का..? अनेक ठिकाणी रेकॉर्ड रूम तसेच स्टॉक रजिस्टर पूर्ण केली जात नाहीत. तर चारा वाटपाच्या ठिकाणी कॅमेरे न लावता ते दुसऱ्याच दिशेला लावण्यात आले आहेत. मिनरल मिक्सरसुद्धा देताना अनेक शेतकऱ्यांवरत छावणी चालक अन्याय करत आहेत. शेतकऱ्यांना दिलेले कार्ड आणि चारा देतानाची सीसिटीव्ही फुटेज याची पडताळणी कधी होणार ?, चारा छावणीवरील अडचणी कोण सोडवणार ? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
मागील आठ महिने पाऊस नसल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यात कोठेच ओला चारा उपलब्ध झाला नाही. तालुक्याबाहेरुन व पर जिल्ह्यातील ऊस, मकवान आणले जाते. मात्र, त्याचे नियमाप्रमाणे वाटप केले जात नाही. मात्र, दुसरीकडे तालुक्यातील नेते मंडळी मंत्री महोदयाकडे आमच्या तालुक्यात पाऊस नसल्याने छावण्यांना मुदत वाढीची मागणी करत आहेत. परंतु, छावणी चालक जनावरांच्या मालकांवरच देईल तेवढाच चारा व पेंड घ्या, तक्रार करायची नाही, असे म्हणत दम भरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सध्या छावण्यात सुरु असल्याची प्रचिती येते. तालुक्याचे प्रशासन याकडे लक्ष देणार का..? पाहणे गरजेचे आहे.