सातारा - खासगी सावकारीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी वडूजमधील सावकारी प्रकरणात बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामधील बारापैकी नऊजण फरार आहेत. यामुळे दुष्काळी भागात खासगी सावकारांचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सावकारी प्रकरणात अटकेत असलेल्या तीन आरोपींना पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र, या खासगी सावकारीच्या रक्कमा पाहता एवढ्या रक्कमा कुठून व कशा आल्या, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. या जिल्ह्यात असणाऱ्या छोट्या-मोठ्या सावकारांकडे एवढ्या मोठ्या रक्कमा कुठून मिळतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुष्काळी भागात सावकाराचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पोलीस प्रशासन याची दखल घेत नसल्याचे समोर आले आहे.
अनेक वेळा सावकारी प्रकरणात तक्रारी झाल्या, मात्र काही दिवसात प्रकरण मिटले गेल्याने शेतकरी देखील तक्रार करत नसल्याचे नागरिक बोलत आहेत. याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तालुक्यातील व जिल्ह्यातील सावकारांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच नाहक त्रास त्यांना सहन करावा लागणार आहे.