सातारा - माण तालुक्यात शासनाने 20 चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यामधील फक्त 10 चारा छावण्या सद्या सुरू आहेत. यामुळे जनावरांचे हाल होत आहे. तसेच 60 ते 65 चारा छावण्यांच्या मंजुरीचे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. दुष्काळी भागातील अनेक ठिकाणी मागणी होत असून देखील प्रशासन याची दखल घेत नसल्याचे शेतकऱयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला. शासनाने 25 जानेवारीला चारा छावण्या सुरू करण्याची मान्यता प्रशासनाला दिली. मात्र कागदपत्राच्या प्रक्रियेत 25 जानेवारीच्या छावण्या सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांना 25 एप्रिलची वाट पहावी लागली. दिवसेंदिवस चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शासनाने टँकर चालू केले पण पाणी 15 ते 20 दिवसातून मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
चारा छावणीमध्ये माळशिरस, अकलूज, बारामती आणि फलटण या भागातील ऊस, मका आणि कडवळ या प्रकारचा चारा उपलब्ध करण्यात येत आहे. मात्र तो पुरवठा अपुरा ठरत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या जनावरांना 15 किलो तर लहान जनावरांना साडेसात किलो चारा देण्यात येत आहे. तो पुरत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोठ्या जनावरांना 20 ते 25 किलो आणि लहान जनावरांना 15 किलो चाऱ्याची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.
शासनाने छावणी चालकांना पेंड देण्यास सांगितले आहे. मात्र काही ठिकाणी पेंड दिली जात नाही. तसेच काही खाजगी छावण्याच्या ठिकाणी सर्व काही मिळत असून पाण्याची अडचण असल्याने 'त्या' चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. जनावरांची देखभाल करण्यासाठी डॉक्टरचे पथक नेमण्यात आले आहे. मात्र, अनेक छावण्यामध्ये डॉक्टर फिरकले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.