सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या रक्तपेढीत तुटवडा निर्माण झाला आहे. यामूळे गरजूंना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी देवापूर येथे माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसकडून रक्तदान शिबीर घेण्यात आले.
राज्यात सध्या रक्ताची गरज भासत असून यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करणे गरजेचे झाले आहे. यामुळे गरजूंना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे व सचिव दादासाहेब काळे, डॉ. सागर सावंत, पंकज पोळ यांनी रक्तदान शिबिर घेतले.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला पोलिसांनी अडवू नये म्हणून टोकन पद्धत व सोशल डिस्टंन्सिंग पद्धतीचा अवलंब करत प्रत्येक रक्तदान करनाऱ्याला वेळ ठरवून देण्यात आली होती. यामुळे शिबीर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत व्यवस्थित पार पडले. रक्तदान शिबीराच्या वेळी म्हसवड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट, देवापूर गावचे सरपंच संजय जाधव, बिजवडीचे उपसरपंच योगेश भोसले उपस्थित होते.