सांगली - येत्या ३ दिवसात प्रशासनाने सांगलीची बाजारपेठ उघडण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापारी स्वतः हून दुकान उघडतील, असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे. याप्रकरणी कोणत्याही कारवाईस व्यापारी तयार आहेत, अशी भूमिकाही व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी स्पष्ट केली आहे.
सांगली जिल्हा प्रशासनाकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. रहिवासी क्षेत्र आणि सांगली शहराबाहेरच्या दुकानांना उघडण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सांगली शहरातील मुख्य बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवरील दुकानांना उघडण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे. यावरून आता सांगलीतील व्यापारी आक्रमक झाले आहेत. व्यापाऱ्यांची संघटना असणाऱ्या व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यात आला आहे.
गेल्यावर्षी सांगली शहरामधील व्यापार महापुरात बुडाला आहे. त्यातून सावरत असताना, आता कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे इथला व्यापार जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. पुढे पावसाळा असल्याने महापुराचा पुन्हा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे सांगलीच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी नियम अटी घालून परवानगी देणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासन याबाबत सहकार्याची भूमिका घेत नाही. शहराबाहेरच्या दुकानांना परवानगी, मात्र शहरातल्या दुकानांना परवानगी का नाही? कोरोना त्या ठिकाणी होऊ शकत नाही का? तो फक्त शहरातील बाजारपेठेतच होऊ शकतो का? असा सवाल व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी बोलताना समीर शहा म्हणाले की, येत्या 3 दिवसात प्रशासनाने सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापार उघडण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापारी स्वतः हून दुकाने उघडतील. मग प्रशासनाला व्यापाऱ्यांवर जी कारवाई करायची आहे, ती त्यांनी करावी. त्यासाठी व्यापारी तयार आहेत, असा इशारा व्यापाऱ्यांच्या वतीने समीर शहा यांनी दिला. त्यामुळे आता सांगलीॉमध्ये व्यापारी विरुद्ध प्रशासना असा संघर्ष निर्माण झाला आहे.