सांगली - मिरज रोडवरील सुंदराबाई मालू या मुलीच्या बाल सुधारगृहातील ४ मुलींनी सोमवारी पलायन केल्याची घटना घडली. सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारत त्यांनी रिक्षातून पळ काढला. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
चारही मुली वेगवेगळ्या गुन्ह्यात बाल सुधारगृहात होत्या. सोमवारी दुपारी सुधारगृहात कोणी दिसत नसल्याचा फायदा उठवत त्यांनी वसतीगृहाच्या मागील बाजूच्या दरवाज्याची कडी तोडली. यानंतर त्यांनी सुधारगृहाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून रस्त्यावर येऊन एका रिक्षामध्ये बसत धूम ठोकली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी अधिकारी स्वाती पाटील यांनी दिली.