सांगली - जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगणहल्ली येथील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. बिराज आप्पासो हिप्परकर (वय १५), असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून वडिलांनी अभ्यासासाठी रागवल्यामुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
विराजने नववीची परीक्षा दिली होती. यंदा दहावीला जाणार होता. तो सुट्टी असल्यामुळे आपल्या मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी त्याच्या वडिलांनी खेळतोस कशाला अभ्यास कर, असे म्हटले. त्यामुळे रागाला येऊन त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर त्याला जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद दौंडे यांनी याबाबतची माहिती जत पोलिसांत दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक आप्पासाहेब हाके करत आहेत.