रत्नागिरी - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीच केलेल्या मोठ्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळले. राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयाला आली. शिंदे गट आणि भाजपची युती होत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. या सत्तासंघर्षांत रत्नागिरी, सिंधुदुर्गातील एकून 3 आमदार शिंदे गटात गेले आहे. यावरती आता शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जे दूर गेले, त्यांना जा असं म्हटलेलं नाही. आता दिल्या घरी सुखी रहा, असे राजन साळवी यांनी बंडखोर आमदारांना म्हटलं ( rajan salavi taunt shivsena rebel mla ) आहे.
प्रसारममाध्यमांशी संवाद साधताना राजन साळवी म्हणाले की, संपूर्ण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बाले किल्ल्यामध्ये उदय सामंत, दिपक केसरकर ही मंडळी राष्ट्रवादीतून आली होती. शिवसैनिकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे हे त्यांनाही आणि जनतेनेलाही माहिती आहे. त्यामुळे भविष्यात जे शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर उभे राहतील ते निवडून येतील, आणि पुन्हा हे गतवैभव प्राप्त होईल.
"दिल्या घरी सुखी रहा" - जे आता शिवसेनेतून सोडून गेलेले आहेत, जे दूर गेलेले आहेत, त्यांना आम्ही जा असं म्हटलेलं नव्हतं. त्यांना वाटलं म्हणून ते गेलेले आहेत, आता दिल्या घरी सुखी राहा, असा आपला त्यांना संदेश असल्याचं सांगत राजन साळवी यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे.
"रिफायनरी प्रकल्प राजापूरमध्ये व्हावा" - रिफायनरी प्रकल्प राजापूरमध्येच व्हावा ही माझी आजही भूमिका आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारी शंभर टक्के दूर होईल. या प्रकल्पामुळे माझा जिल्हा आणि राज्याची प्रगती होईल हा मला विश्वास आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांना एक पत्र दिलं होतं. त्यामुळे मी सुद्धा शिवसेनेचा स्थानिक आमदार म्हणून ती भूमिका घेत पुढे गेलेलो आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणी व्हावा ही माझी इच्छा, अपेक्षा असल्याचं राजन साळवी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - 'संदीपान भूमरेंनी मंत्री झाल्यावर माझ्यासमोर लोटांगण घातलं.. CCTV फुटेज देतो - संजय राऊत