रत्नागिरी - संगमेश्वर विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना विचारांचे तब्बल 230 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. आजच्या घडीला 63 पैकी 34 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा सरपंच बसू शकतो, अशी परिस्थिती असून 15 तारखेनंतर तब्बल 50हून अधिक ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात येऊन त्यावर भगवा फडकलेला असेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी 63 ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांची माहिती दिली. यावेळी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, जि.प. सदस्य महेश म्हाप आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, महाविकास आघाडीबाबत आपण राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा केली होती. मात्र ज्या ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांच्या पदाधिकार्यांनी संपर्क केला. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सदस्यांना संधी देण्यात आली असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
या ठिकाणी शिवसेना सदस्य बिनविरोध
रत्नागिरी-संगमेश्वर मतदार संघातील संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथे 11, पिरंदवणे 7, वांद्री 4, कोंड्ये 5, डावखोल 7, कुरधुंडा 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत. डिंगणे, नावले, लोवले या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. रत्नागिरी तालुक्यात उक्षी 7, राई 1, चवे 7, खालगाव 9, जांभरुण 7, खरवते 7, गणपतीपुळे 1, चिंद्रवली 9, कुरतडे 9, झरे 5, हरचिरी 11, भाट्ये 3, पानवल 7, नाचणे 4, कशेळी 2, कापडगाव 7, हातखंबा 7, खानू 7, पाली 10, खेडशी 9, मजगाव 2, नाखरे 2, पावस 2, गावखडी 2, रिळ 7, आगरनरळ 7, गुंबद 7, सैतवडे 1 व वरवडे मध्ये 1 जागी शिवसेना सदस्य बिनविरोध झाल्याचे सामंत यांनी सांगितले.
63 पैकी 50हून अधिक ग्रामपंचायतींवर भगवा फडकेल
रत्नागिरीतील चाफे, देवूड, ओरी, कोतवडे, नेवरे, चांदेराई, कोळंबे, गोळप, नाणीज, काळबादेवी, बसणी, मिर्या, सडामिर्या, दांडेआडोम, डोर्ले, शिवारआंबेरे, वाटद, गडनरळ या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होत असून, या ग्रामपंचायतीही सेनेच्या ताब्यात येण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. 63 पैकी 50हून अधिक ग्रामपंचायतीवर सरपंच पदी शिवसैनिक बसेल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.