पुणे - कोरोना विषाणूने संपूर्ण जगासमोर आव्हान निर्माण केले आहे. देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला असला तरी कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाययोजना व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून येवले अमृततुल्य यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक 5 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. तसेच येवले अमृततुल्य संचलित “येवले फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेद्वारे कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर आस्करवाडी व भिवरी या ठिकाणी 2000 मास्क व सॅनिटाईझरचे वाटप केले गेले. कोरोनो व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक जण मदत करत आहे. परंतु, सध्या या व्हायरसपासून स्वत:चा बचाव करणाऱ्या साधनांचा तुटवडा जाणवत आहे. याच हेतूने येवले फांऊडेशनच्या वतीने पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी व भिवरी येथील संपूर्ण गावकरी कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच पोलिसांना मास्क तसेच सॅनिटायझरचे मोफत वाटप केले गेले.
संपूर्ण गावामध्ये निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या आपत्तीत लढणाऱ्या या सर्व मंडळींना मोफत येवले अमृततुल्य चहा देण्याचे काम सुरू आहे. मनाने आणि शरीराने थकलेल्या या जीवांना तेवढीच तरतरी यावी आणि त्यांच्या कामात आपलाही खारीचा वाटा असावा, एवढाच यामागे उद्देश असल्याचे येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले यांनी सांगितले.