राजगुरूनगर (पुणे) भामा आसखेड धरणातून पुणे शहराच्या पुर्व भागाला पाणी पुरवठा लवकरच सुरू होणार आहे. त्यातच आज दुपारी भामा आसखेड धरणातून, शिरूर व दौड तालुक्यातील शेतीसाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन भामा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पुढील काळात पुणे शहराच्या पूर्व भागाला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने, पावसाळ्यापर्यंत धरणात पाणी शिल्लक असेल की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
बंधारे भरण्यासाठी आवर्तन
भामा आसखेड हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 8.14 टीएमसी इतकी असून, धरणात सध्या जिवंत पाणीसाठा 7.55 टीएमसी इतका आहे. खेड तालुक्यातील भामा नदीवरील आठ बंधारे भरण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे. या बंधाऱ्यात सोडण्यात आलेले पाणी शेती साठी आणि पिण्यासाठी वापरले जाते. सध्या धरणात ९८.५८ टक्के इतका पाणीसाठा असून, मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ९९.३६ टक्के पाणीसाठा होता.
शेतीला पुन्हा पाणी मिळणार का?
भामा आसखेड धरणातून पुण्यासाठी दररोज 200 एमएलडी एवढा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, सध्या चाचणी सुरू आहे. ज्यावेळी धरणातून पूर्ण क्षमतेने शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल, तेव्हा शेतीसाठी पाणी पुरेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.