पुणे- मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी जात आहे. तसेच, अनेक रुग्ण घरी विलगीकृत होण्याचा पर्यायही निवडत आहेत. त्यामुळे, त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. जेवढी कोविड केअर सेंटर रिकामी होतील, तेवढे आपण यशस्वी होऊ. तसेच, पुढील ७ दिवसात कोरोना रुग्णांचा दर कमी झाल्यास कोरोनाचा दर कमी झाला असे म्हणता येईल, असे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
बुधवार पेठेतील कोतवाल चावडीजवळ झालेल्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयूग तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी दहिहंडीचा उत्सव आयोजित करण्यात येतो. मात्र यावर्षी हा उत्सव रद्द करण्यात आला असून ट्रस्टतर्फे महापालिकेला २ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपकरणे देण्यात आली आहेत. सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उपकरणे आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
पुण्यामध्ये आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी एक जंबो रुग्णालय साकारण्यात येत आहे. सुमारे ८०० खाटांची ही रुग्णालये असणार आहेत. भविष्यात जंबो रुग्णालयांची गरज पडली नाही, तर चांगलेच आहे. मात्र, त्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. आजमितीस कोरोनामुळे होणारा मृत्युदर हा २.५ टक्के इतका आहे. तो १ च्या खाली येणे गरजेचे आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सुवर्णयूग तरुण मंडळाने गणेशोत्सव आणि दहिहंडी उत्सवाबाबत घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. रुग्णालयांना मंडळाने दिलेले २ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपकरणे अत्यंत उपयुक्त आहेत, असे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.
तसेच, उत्सव रद्द करून त्यावर खर्च होणाऱ्या रकमेतून सामाजिक बांधिलकी जपली असून पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयास कायमस्वरूपी उपयोगी पडेल असे २ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपकरणे दिली आहेत. ही मदत नसून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले असल्याचे सुवर्णयूग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण म्हणाले.
कार्यक्रमाला स्थायी समिती अध्यक्ष व ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण उपस्थित होते.
हेही वाचा- मर्जीतले अधिकारी आणण्याचा डाव हे सरकार हाणून पाडेल - माजी आमदार गोरे