पुणे : भोर तालुक्यातील नांदगावचे रहिवासी, शिक्षक असलेले सुनील दत्तात्रय गोळे आणि संतोष दत्तात्रय गोळे (मेकॅनिक) यांच्या घरकाम आणि शेती करणाऱ्या मातोश्री राहीबाई गोळे (वय ६२) यांचे वर्षापुर्वी कोरोनामुळे बाणेर (पुणे) येथे निधन झाले. निधनानंतर वर्षश्राद्ध सारेच करतात. परंतु, आईविषयी असणारे प्रेम, श्रद्धा, भावना व्यक्त करताना गोळे कुटुंबाने घरासमोरच मंदिर उभारले. त्यात आईच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या कुटुंबाने आईचे स्मारक उभारले व समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक सुनील गोळे आणि मेकॅनिक संतोष गोळे या दोघा भावांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
गोळे कुटुंबाच्या कृतीचे कौतुक : राहीबाई गोळे यांनी शेती आणि सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या पती दत्तात्रय गोळे यांच्यासोबत ४५ वर्ष सुखात संसार केला. त्यांना चार अपत्ये आहेत. त्या सर्वांना चांगले शिक्षण देऊन, त्यांच्यावर चांगले संस्कार केले. राहीबाई या कुटुंबावरच प्रेम करुन थांबल्या नाहीत. तर राहीबाई यांचे नातेवाईक आणि गावासाठी असणारे प्रेम तसेच आपुलकी आजही ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. परिसरातल्या नागरिकांनी गोळे कुटुंबाच्या या कृतीचे कौतुक केले आहे.
स्मारक बांधण्याचे ठरवले : या चार मुलांना आईच्या निधनानंतर सतत आईची आठवण येत होती. आई घरी नसल्याचे दुःखही सहन होत नव्हते. त्यावेळी राहीबाई यांचे पती दत्तात्रय गोळे तसेच सुनिल, संतोष ही दोन मुले, निलीमा खंडाळे, प्रमिला पाडळे या दोन मुली आणि संतोष पाडळे (जावई) यांनी विचार विनीमय करुन स्मारक बांधण्याचे ठरवले. ८ एप्रिल रोजी पुतळा अनावरण सोहळ्याने त्यांची ही कल्पना सत्यात उतरली. यावेळी होम हवन, महाप्रसाद, हभप नेहाताई साळेकर यांचे किर्तन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठल आवाळे यांचे हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले. यावेळी नांदगाव सरपंच प्रीती गोळे, बिडी गायकवाड, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा : Shivaji Maharaj Memorial In Arabian sea : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रातच होणार -नरेंद्र पाटील