पुणे - आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहे. त्यांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत हिंदूची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य निर्माण केले. देशात एक प्रकारची नवीन चेतना निर्माण केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे 'मार्गदर्शक' आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यावेळी काढले. त्यांनी आज (सोमवारी) किल्ले सिंहगडावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, राज्यपालाचे विशेष सचिव राकेश नैथानी, उपवनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थितीत होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान व स्वाभिमान आहेत. त्यांच्या सारखे इतर थोर राष्ट्रपुरुषांबद्दल लहान मुलांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज घडतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला. राज्यपाल कोश्यारी यांनी सुरूवातीला लोकमान्य टिळक यांच्या विश्रामधामाला भेट देवून माहिती जाणून घेतली. त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
हेही वाचा -आजपासून पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज