पुणे - राज्यातले दैनंदिन व्यवहार सुरू असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादीने अचानक भाजपला पाठिंबा देत सत्तास्थापन केली. त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णयामागे शरद पवारांची राजकीय खेळी आहे, की अजित पवार यांचा बंड या चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, बारामतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
आज सकाळी आठ वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी या दोन्ही नेत्यांना पदाची शपथ दिली. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अजित पवार यांनीही शिवसेनेबरोबरची चर्चा संपत नसल्याने राज्यात सरकार आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या निर्णयाबाबत अंधारात असल्याचंही दिसत आहे. सत्तास्थापनेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या निर्णयाची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते आहेत. त्यामुळे थेट अजित पवार यांनीही पाठिंबा दिला असावा, अशी चर्चा आहे. यावर शरद पवारांनी अजित पवारांच्या या पाठिंब्याला सहमती नसल्याचे सांगितले आहे.