पुणे- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून बाकी सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे. जीवनावश्यक सेवांमध्ये भाजी बाजारांचा देखील समावेश आहे. त्यामुळे, शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून आजपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भाजीबाजार सरू करण्यात आले आहे.
आज बाजारात एकूण ८५९ गाड्यांची आवक झाली असून शहरात ८० टक्के भाजीपाला उपलब्ध झाला आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना बाजारत गर्दी वाढत होती. त्यामुळे, भीतीपोटी बहुसंख्य अडत आणि कामगारांनी काम बंदचे आवाहन केले होते. मात्र, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने अडत आणि कामगारांना बंद वापस घेण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत अडत आणि कामगार आजपासून बाजारात काम करण्यास तयार झाले आहेत.
आडत आणि व्यापाऱ्यांना ओळखपत्र आणि स्टिकर देण्याचे काम बाजार समितीने केले आहे. मात्र, खरेदीसाठी फक्त ठोक विक्रेत्यांनाच बाजार आवारात प्रवेश दिला गेला. दरम्यान, नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत घराजवळ सर्व माल उपलब्ध होईल, असे आवाहन बाजार समितीने नागरिकांना केले आहे. त्याचबरोबर, बाजार आवारात एक दिवस भाजीपाला व फळे आणि एक दिवस कांदा- बटाटा विभाग सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हेही वाचा- खासदार गिरीश बापट यांच्याकडून कोरोना उपायांसाठी 50 लाखांचा निधी