पुणे - बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत असताना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुसळेवाडी एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात वासरू ठार झाले असून या हल्ल्याचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
खेड तालुक्यातील कडुस-मुसळेवाडी येथील शेतकरी बाळू ज्ञानेश्वर पांगारे यांच्या पाळीव जनावरांचा गोठा डोंगराच्या पायथ्याशी आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तीन वर्ष वयाचे वासरू ठार झाले. त्यावेळी गोठ्यात वासरासहीत दोन बैल आणि दोन गायी सुद्धा बांधलेल्या होत्या. पण त्यांना बिबट्याने इजा पोचवली नाही. बिबट्याने केलेल्या या हल्ल्याचा थरार गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हल्ल्याच्या अगोदर काही काळ बिबट्या गोठ्याभोवती फिरताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने पंचनामा केला. मात्र, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - 'मुलगा दुसऱ्याच्या घरी झाला आणि पेढे हे वाटतायत'