बारामती - प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत अंबिया बहार सन २०२०-२१मध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, काजू, स्ट्रॉबेरी (प्रायोगिक तत्वावर) या आठ फळांसाठी शासन निर्णयानुसार पुणे जिल्ह्यामध्ये अटी, शर्ती व अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोके निकषानुसार राबविण्यात येत आहे. पुर्नरचित हवमान आधारीत फळपिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला देणे अपेक्षित आहे. जेणेकरून बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही.
अंतिम मुदत ३१ डिसेंबर
योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना अंबिया बहार सन २०२० या हंगामाकरीता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने/भाडेपट्टेने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. अंबिया बहरातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरिक्त विमा संरक्षण देण्यात येते. त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ०४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उप्तादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झालेचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल त्यासाठी अधिसूचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय आंबा–५ वर्षे व डाळिंब–२ वर्षे असे आहे. सदर योजना अंबिया बहरामध्ये पुणे जिल्ह्यासाठी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे या विमा कंपनीमर्फत राबविण्यात येत आहे. आंबिया बहार २०२०मध्ये फळपिक निहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२० आहे.
नुकसान झाल्यास ४८ तासांत कळविणे
या योजनेमध्ये आंबा या फळपिकासाठी अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान व डाळिंब या फळपिकासाठी जादा तापमान, जास्त पाऊस व आर्द्रता इत्यादी हवामान धोके समाविष्ट करण्यात आले आहेत. विमाधारक शेतकऱ्यांनी गारपिटीमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस/संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
गर्दी टाळण्याचे आवाहन
गर्दी टाळण्यासाठी अंतिम दिनांकाची वाट न पाहता त्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरण्याची कार्यवाही करावी असे आवाहन, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.