पुणे - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर राज्यांसाठी आतापर्यंत पुणे विभागातून ६६ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. याद्वारे ८६ हजार ५९० परप्रांतीयांना त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तर प्रदेशसाठी 29, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 8, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 2, छत्तीसगडसाठी 2, जम्मू आणि काश्मीरसाठी 1, अशा एकूण 66 रेल्वेगाडया सोडण्यात आल्या. तसेच 20 मे रोजी पुणे विभागातून उत्तरप्रदेशसाठी 4, बिहारसाठी 3 तसेच छत्तीसगडसाठी 1 अशा एकूण 8 रेल्वेगाडया नियोजित असून यामध्ये एकूण 11 हजार 324 प्रवासी प्रवास करणे अपेक्षित आहेत. यापैकी पुणे स्थानकावरून उत्तरप्रदेशसाठी 3, छत्तीसगडसाठी एक रेल्वे 5 हजार 417 प्रवाशांसह सोडली जाणार आहे, तर सातारा रेल्वे स्थानकावरून उत्तरप्रदेशसाठी 1 हजार 456 प्रवाशांसह एक रेल्वेगाडी नियोजित आहे. सांगली स्थानकावरून बिहारसाठी एक रेल्वे 1 हजार 539 प्रवाशांसह व कोल्हापूर स्थानकांवरून बिहारसाठी 2 हजार 912 प्रवाशांसह 2 रेल्वेगाड्या नियोजित आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पुणे विभागातून 5 हजार 871 बसद्वारे 76 हजार 294 प्रवासी आपल्या मूळ गावी गेले आहेत. तसेच 289 बसद्वारे 5 हजार 708 प्रवासी पुणे विभागात दाखल झाले आहेत. या नागरीकांच्या प्रवासाच्या नियोजनासाठी सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावत असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.