परभणी - जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील एका तरुण शेतकऱ्याने आज (रविवार) दुपारी आपल्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या शेतकऱ्याला नापिकी किंवा सध्या चालू असलेल्या लॉकडॉनमुळे शेतीमाल विकता येत नसल्याची चिंता होती, असे सांगण्यात येत आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकेश्वर या गावात आज दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. तुळशीराम दतराव गायकवाड (वय 35) असे या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी मानकेश्वर येेथे स्वतःच्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना जिंतूर शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांचे शवविच्छेदन जिंतूर शासकीय रुग्णालयात करण्यात आले आहे. या शेतकऱ्याच्या पश्चात्य पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.