परभणी : कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ( Statement about Chhatrapati Shivaji Maharaj ) असं वक्तव्य करू शकत नाही. प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल देवाच्या पलिकडे प्रेम आहे. इथे मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभद्र बोलतात. हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील कोणीही सहन करू शकणार नाही. हे सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. राज्यपालांनी जी हिंमत केली आहे याचे परिणाम होणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. ते परभणी येथे बोलत होते.
खासदार फौजिया खान यांच्या सत्कार कार्यक्रमाला मुंडे यांची उपस्थिती -
परभणीच्या बी. रघुनाथ सभागृहात सोमवारी रात्री राज्यसभा खासदार फौजिया खान यांना संसदरत्न पुरस्कार ( Parliamentary Award to Faujia Khan ) भेटल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लावल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पत्रकारांशी बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार बाबाजानी दुर्रानी, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाबाई विटेकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार विजयराव गव्हाणे, डॉ. मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, डॉ. विवेक नावंदर, रविराज देशमुख, तहसीन खान, मनपा सभागृहनेते माजूलाला आदींसह परभणीतील प्रमुख नेते उपस्थित होते.
माझी जबाबदारी अजून वाढली - खासदार फौजिया खान
मला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर परभणीतील नागरिकांनी माझा सत्कार ठेवला, त्याबद्दल मी आनंदी आहे. यापूर्वी देखील परभणीने मला भरभरून प्रेम दिले आहे. परभणीकरांच्या या प्रेमामुळे यापुढे ही मी आणखीन क्षमतेने परभणी तसेच महाराष्ट्राचे प्रश्न राज्यसभेत मांडेन. माझी जबाबदारी आणखीन वाढल्याची भावना यावेळी खासदार फौजिया खान यांनी व्यक्त केली.
'या' विषयांवरही धनंजय मुंडेंनी व्यक्त केले मत -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या बद्दल बोलताना धनंजय मुंडे म्हणाले ( Dhananjay Munde statement about Raju Shetty ), राजू शेट्टींची ओळखच चळवळीची आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, तो प्रश्न उत्तर सोडवला पाहिजे नाही, तर त्या प्रश्नावर लढा दिला पाहिजे. हा लोकशाहीचा नियम आहे. त्यातील कुठलातरी एक नियम ते पाळतात, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकार देखील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी संबंधितांना आवाहन करत आहे, असेही सांगितले.
ओबीसींचे आरक्षण ( Reservation of OBCs ) देखील कायम राहण्यासाठी राज्य सरकार भूमिका घेत असून, मंडळ आयोगानंतर महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची भूमिका असल्याचे देखील ते म्हणाले. तसेच खासदार फौजिया खान यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून एका विचारधारेला आणि एका नेतृत्वाला स्वीकारून समाजकार्य केले आहे. त्यामुळे त्या चांगल्या क्षमतेने संसदेत प्रश्न मांडू शकतात, असे देखील धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमात सांगितले.