परभणी - समाजकल्याण विभागाकडून विविध उद्योगांसाठी चार मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांनी तब्बल आठ कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. रकमेचा अपहार करणाऱ्या काही मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचा आज (शनिवारी) समाज कल्याण विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पुराव्यानिशी पूर्णा पोलिसात तक्रार दिल्यानंतर या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अशाच उर्वरित काही संस्था जिल्ह्यात असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - डहाणू तालुक्यात अवैध विदेशी दारूसाठा जप्त; एकास अटक
औद्योगिक संस्थांच्या माध्यमातून मागास प्रवर्गातील तरुणांनी उद्योजक व्हावे, यासाठी शासनाने ही योजना आणली होती. मात्र, प्रत्यक्षात उद्योग उभारण्याऐवजी खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाकडून मिळणारा निधी आणि सबसीडी हडप करण्याचा डाव या संस्थाचालकांनी आखला होता. त्यात ते मोठ्या प्रमाणात यशस्वी देखील झाले असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार पूर्णा तालुक्यातील सुरवाडी येथील प्रेरणा मागासवर्गीय सहकारी संस्था, परिवर्तन मागासवर्गीय सहकारी संस्था, रमाबाई मागासवर्गीय सहकारी संस्था व रामोजी मागासवर्गीय सहकारी संस्थांनी सरकारकडून दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले होते. मात्र, संस्था चालकांनी कर्जाच्या रकमेचा योग्य वापर केला नाही. तसेच बनावट कागदपत्रे व देयके सादर करून खोटा दस्तावेज खरा असल्याचे भासवले.
शासनाने मंजूर केलेल्या 15 कोटी 25 लाख रुपयांपैकी सुमारे 8 कोटी 30 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कृष्णा कवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी, संस्थेचे आत्तमराव यशवंत वाटोडे, विनोद बाबाराव बेकटे, विश्वनाथ नारायण घोडके, यशवंत वाटोडे, गौतम यशवंत वाटोडे, रामप्रसाद काळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष राठोड करित आहेत. दरम्यान, या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी लक्ष घालून संबंधितांना कारवाईचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अशाच काही इतर संस्था देखील शासनाच्या निधीचा गैरवापर करत असल्याचे चौकशीत पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा संस्थांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा - काँग्रेसचा १३५ वा स्थापना दिवस दिल्लीत साजरा