परभणी - राज्यातील महाविकास आघाडी सरकार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात मशगुल आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार नाराज असून, ते लवकरच सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. त्यामुळे, कदाचित काँग्रेस पक्ष पाठिंबा काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर हे सरकार कोसळणार आहे. आणि त्यानंतर भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार राज्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी परभणीत व्यक्त केला.
हेही वाचा - Married Couple Death : परभणीतील सेलू गावात एका घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह, कारण अस्पष्ट्
परभणी शहरात आज शनिवारी गायरान हक्क परिषदेसाठी आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपाईचे राज्य सरचिटणीस डी.एन. दाभाडे, जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, डॉ. सिद्धार्थ भालेराव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, शिवसेनेला अजूनही संधी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यायला पाहिजे. त्यांचे हे स्वप्न महाविकास आघाडीत राहून साकार होणार नाही. त्यासाठी शिवसेनेला, तसेच उद्धव ठाकरे यांना भाजप आणि आरपीआयसोबत यावे लागणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. अडीच - अडीच वर्षांच्या फॉरम्युल्यावर विचार होऊ शकतो. कारण शिवसैनिकांच्या मनामध्ये अजुनही आपण भाजपसोबत जायला पाहिजे, असे असल्याने अनेक आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असल्याचे देखील आठवले म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मजबूत करण्यासाठी भाजप सत्तेत आलेला आहे. दलितांच्या आरक्षणाला संरक्षण देण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे, त्यांच्या विरोधात आकांडतांडव करण्यात काहीही अर्थ नसल्याचे आठवले यावेळी म्हणाले. तसेच, नुकत्याच झालेल्या चार राज्यांत दलितांनी भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. एकेकाळी महाराष्ट्रात भाजप, शिवसेनेच्या विरोधात असणारा दलित समाज आता भाजपच्या सोबत आला आहे. महायुतीच्या बाजूने वळला असल्याने 2024 मध्ये राज्यात महायुतीचे सरकार येईल, असा देखील विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Gutkha Mafia Raid : परभणीत मध्यरात्री गुटखा माफियांवर छापा ; 9 लाखांच्या गुटख्यासह 19 लाखाचा मुद्देमाल जप्त