पालघर - लखन भैय्या एन्काउंटरमध्ये तेरा सहकाऱ्यांना लटकावून स्वतः नामनिराळे होणाऱ्याने आम्हाला नैतिकता शिकवू नये, असा टोला बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नालासोपारा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यावर केली. तसेच झोपलेल्या लोकांना आणि हातात बेड्या घातलेल्यांना गोळ्या घालण्यात कसली आली मर्दानगी ? सगळे वर्दीवाले सावकार नसतात आणि एकदा वर्दी उतरली की तो आम आदमी असतो, अशी टीका करत ठाकूर यांनी अखेर मौन सोडले.
हेही वाचा - धुळे: शिरपूर स्फोट प्रकरणी 3 जणांना अटक
गेले काही दिवस प्रदीप शर्मा यांच्याबाजूने शहरात "चोर की पोलीस" असे फलक लावण्यावरून, तसेच अन्यही भाषणबाजीतून आमदार ठाकूर यांच्यावर टीकेची झोड उडविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) बविआतर्फे विरार येथे पत्रकारांसोबत चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी शर्मा यांच्यावर ठाकूर पिता-पुत्रांनी पलटवार करीत येथील निवडणुकीत रंगत भरली आहे.
हेही वाचा - शरद पवारांवर गुन्हा दाखल करणे ही राजकीय कृती - बाळासाहेब थोरात
पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर बोलतांना आमदार ठाकूर पिता-पुत्रांनी शर्मांचा खरपूस समाचार यावेळी घेतला. आम्ही बाराही महिने लोकांशी कनेक्ट राहून मतदार संघात कार्यरत असतो. जे बाराही महिने नियमित अभ्यास करतात, त्यांना परीक्षेची भीती नसते. समोरील उमेदवारावर टीका करण्यात शक्ती खर्च न करता, तीस वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि तीन आमदार मिळून केलेल्या विकास कामांना लोकांपुढे पुढे ठेवतो. विरोधकांकडे मात्र सांगायला विधायक मुद्देच नसल्याने घासून गुळगुळीत झालेला आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेला "दहशतवाद" हा पारंपरिक मुद्दा दर निवडणुकीत मांडला जातो, असेही ठाकूर यावेळी म्हणाले.
हेही वाचा - पुण्यात आलेला पूर हा अनधिकृत बांधकामांमुळेच - चंद्रकांत पाटील
एका निरीक्षक पदापर्यंतच्या पोलीस अधिकाऱ्याचा पगार किती असतो ? मग पी. एस. फाउंडेशनकडे खर्च करायला इतका पैसा येतो कुठून ? पैशाच्या बळावर आणि मीडियातून 'शो'बाजी करून वसईत निवडणूक जिंकता येत नाही. येथील लोक सुसंस्कृत आहेत. त्यांना गृहीत धरता येत नाही. विरोधकांना येथे उमेदवारही मिळत नसून, बोईसर मध्ये आमच्याकडूनच गेलेला, वसई मध्ये काँग्रेस मधून आलेला तर नालासोपाऱ्यात मुंबईतून आणलेला निवृत्त अधिकारी उमेदवार उभा करावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी आमदार क्षितिज ठाकूर, महापौर प्रवीण शेट्टी, माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर नारायण मानकर, बविआचे कार्याध्यक्ष राजीव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेट नाईक, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.