पालघर - जिल्ह्यातील उंबरवांगन गावातील बहुतांशी आदिवासी समाज डोंगरमाथ्यावर मोगरा शेतीची लागवड करताना दिसतोय. या मोगरा फुलातून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यास मदत होत आहे. नागली, वरई घेणारा शेतकरी हा मोगरा शेतीकडे वळला आहे. ही मोगरा लागवड इथल्या आदिवासी समाजाला फलदायी ठरत असली तरी ही मोगराशेती पाण्याअभावी उन्हाळ्यात अडचणीत येत असते. या शेतीला मुबलक पाणी आणि वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या शेतकरी वर्गाकडून केली जातेय.
पालघर जिल्ह्यातील जव्हार भागातील उंबरवांगन हे गावातील बहुतांशी शेतकरी वर्ग मोगरा शेतीकडे वळला आहे. या भागातील शेती उंच डोंगरमाथ्यावर खडकाळ जागेत ही मोगरा शेती केली जातेय. रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजूर वर्गाला ही शेती यशदायी आणि रोजगाराला चालना देणारी आहे.
शहरातील बाजारांत जातो मोगरा
उत्पादित केलेली मोगरा कळी एकत्रित करून जव्हार-पालघर-ठाणे या दिशेने जाणाऱ्या बसेसमधून हा माल मुंबईच्या दादर बाजारपेठेत पाठवला जातो. या मोगरा कळीला बाजारभावाप्रमाणे किंमत मिळत असते. तर, जव्हार-पालघर या मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनाही मोगऱ्याचे गजरे करून विकले जातात. यातूनही शेतकऱ्यांना पैसे मिळतात. या परिसरातील मोगरा शेती करणाऱ्यांच्या कुटुंबाचा अशा पद्धतीने चरितार्थ चालत असतो. मोगरा शेती करणारे शेतकरी हे बंधाऱ्यातून पाणी उपसा करत असतात. हे बंधारे सध्या काही ठिकाणी शुष्क तर काही ठिकाणी भरलेले दिसत आहेत.
मोगरा शेती उत्पन्न वाढीसाठी हवंय वीज आणि पाणी
जिल्ह्यातील उंबरवांगन गावतील फुलवंती कुवरा या महिला शेतकरी गेल्या पाच वर्षापासून मोगरा शेती करत आहेत. स्वत: त्या मोगरा फुलवण्यासाठी राबताना दिसतात. डोंगर उतारावर त्यांनी केलेल्या मोगरा शेतीला पाणी नाही. त्यांच्यापासून जवळ असलेला बंधारा कोरडा पडला आहे. तर, दूरवरून पाणी आणण्यासाठी त्यांच्याकडे वीज नाही. पाणी आणि विजेची समस्या सुटली तर, मोगरा उत्पादनात वाढ होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
मोगरा शेती रोजगाराचे साधन, स्थलांतर रोखण्यास मदत
मोगरा शेती इथल्या बेरोजगाराला रोजगारचे साधन निर्माण करणारी आणि स्थलांतर रोखण्यास मदत करणारी आहे. मात्र, या मोगरा शेती करणाऱ्या शेतकरी वर्गाच्या पाणी, वीज समस्या सोडविणे गरजेचे बनले आहे.