पालघर - जिल्हा कुपोषण मुक्त करणे हा शासन आणि समाजाचा एकत्रित विषय आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास या समस्येवर निश्चित मात करता येईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या बाल संजीवन छावणीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी जव्हार येथे झाले. यावेळी पालकमंत्री चव्हाण बोलत होते.
आदिवासींच्या समस्या या कोणत्याही एका विभागाच्या नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्यांच्या निराकरणासाठी संबंधित सर्व विभागांना एकत्र करून प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना यश येत असून लवकरच पालघर जिल्हा कुपोषण मुक्त होईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, ट्रस्टचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार पास्कल धनारे, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे आदी उपस्थित होते.
अमृता फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यात शासनाने सुरू केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होत असल्याचे नमूद करत यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी धन्यवाद दिले. सर्वांनी एकत्र येऊन असेच काम सुरू राहिल्यास कुपोषणाची समस्या लवकरच संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासी भागात आयुर्वेदिक औषधी असतात. या भागात आयुर्वेदिक एमआयडीसी सुरू करता येतील. त्यामुळे रोजगारही वाढेल, असे त्यांनी सुचविले. बाल संजीवन छावणीच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
यावेळी आरोग्यमंत्री शिंदे म्हणाले की, आरोग्य विभागामार्फत दुर्गम आदिवासी भागात सुद्धा सेवा दिली जात आहे. या भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शासन सर्व उपाययोजना करीत आहे. लहान वयात लग्न होऊ नयेत, यासाठी ट्रस्टच्या वतीने समुपदेशन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करून ट्रस्टला आवश्यक असलेली रुग्णवाहिका देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविकाद्वारे विवेक पंडित यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्व समस्या समजून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना केल्या. त्यामुळे कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे ते म्हणाले. कुपोषणाने एकही मृत्यू होऊ नये ही मुख्यमंत्र्यांची भूमिका असून त्यांना सर्व ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार गावित यांनीही ट्रस्टच्या कामाचे कौतुक केले.