पालघर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वसई क्षेत्रातील विरार शहरातील रहदारीच्या ठिकाणी शनिवारी रात्रीपासून लागलेल्या 'चोर की पोलीस?' अशा होर्डिंग्समुळे येथील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.
वसईत विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे. गेल्या २५ वर्षांपासून बहुजन विकास आघाडीची वसई विरार शहरावर एक हाती सत्ता आहे. मात्र, ठाकुरांचा हा गड जिंकण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नालासोपऱ्यात इन्काऊंटर स्पेशालिस्ट तथा माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उतरविणार आहेत. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांनी यापुढेही मी पोलीस अधिकारी म्हणूनच काम करेन, अशी माहिती दिली होती. त्यातच शनिवारी रात्रीपासून वसई विरार शहरातमध्ये अनेक रहदारीच्या ठिकाणी चोर की पोलीस? असे बॅनर लावण्यात आले आहेत. तर, निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदीप शर्मा नालासोपऱ्यात तळ ठोकणार असल्याने विरोधकांसह मतदारांना उकसविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने अशी बॅनरबाजी केली असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - वसईत काँग्रेसला धक्का; विजय पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश, विधानसभा लढणार?