तारापूर - औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात दूषित वायू सोडल्याने, रविवारी रात्रीच्या सुमारास औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात वायुगळती सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या विषारी वायूमुळे नागरिकांना काही काळ डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे व चक्कर येणे आदी त्रास जाणवू लागला. गावकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर पोलिसांशी संपर्क केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
तारापूर औद्योगिक क्षेत्रात रात्रीच्यावेळी रासायनिक कारखान्यातून दूषित वायू बेकायदेशीरपणे सोडण्यात येतो, तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आता प्रदूषण नियंत्रण मंडळ या कोलवडे गावच्या घटनेनंतर दूषित वायू सोडणाऱ्या रासायनिक कारखान्यांवर काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - अंबाजोगाईत कोरोनाचे मृत्यू तांडव; 48 तासात 30 जणांचा बळी