उस्मानाबाद - जिल्हा सध्या दुष्काळाने होरपळत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरण कोरडेठाक पडली आहेत. या दुष्काळाचा फटका माणसांबरोबरच मुक्या प्राण्यांनाही बसत आहे.
उस्मानाबाद शहरापासून अगदी ६ किलोमीटर अंतरावर हातलादेवी मंदिर आहे. परिसरात सर्वत्र जंगल विस्तारलेले आहे. याठिकाणी मोर, चिमणी, पारवा अशा पक्षांप्रमाणेच लांडगा, माकड, कोल्हा असे जंगली प्राणी आहेत. मात्र, या प्राण्यांना डोंगरावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. या डोंगर परिसराच्या जवळच छोटासा तलाव आहे. मात्र, येथे पाणी प्यायला जायचे म्हटल्यानंतर उस्मानाबाद-बार्शी हायवे ओलांडून प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जावे लागत आहे.
सामान्य नागरिकांनी केली होती पक्षांना पाण्याची व्यवस्था
पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी परिसरात झाडावरती छोटे-मोठे प्लास्टिकचे डबे अडकवून पक्ष्यांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र, प्लास्टिकचे डबे पाण्यावाचून रिकामेच पाहायला मिळत आहेत. परिसरात बहुतांश रोडच्या आजूबाजूची झाडे हिरवी आहेत. या झाडांना ड्रिपच्या माध्यमातून पाणी पुरवले जाते. येथे पक्षांचा किलबिलाट आढळून येतो.