उस्मानाबाद - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. या परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेले निलेगाव येथील पती-पत्नी पुण्याच्या सिंहगड धायरी वडगाव येथून दुचाकीवर गावाकडे निघाले होते. याचवेळी वाटेतच दोघांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला.
निलेगाव येथील दयानंद कुंडलीक दुपारगुडे हे आपली पत्नी, दोन मुले, सून व नातवंडे यांच्यासह सिंहगड धायरी वडगाव येथे राहत होते. ते मुलांना वर्तमानपत्र विक्री व्यवसायात मदत करत होते. तर पत्नी सुवर्णा दयानंद दुपारगुडे या धुणे भांडी करून आपल्या कुटुंबाला मदतीचा हातभार लावत होत्या. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने त्यांचे सर्व व्यवसाय बंद पडले होते.

व्यवसाय बंद असल्याने दोघे दुचाकीने गावाकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत इंदापूरजवळ पाणी पिण्यासाठी रोडच्या कडेला थांबले असता पुण्याकडून येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात सुवर्णा दयानंद दुपारगुडे (वय ४५) या जागीच ठार झाल्या. तर, दयानंद कुंडलीक दुपारगुडे (वय ५२) यांना रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.