नाशिक - जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतीमालाला बसला आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक घटली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
पावसामुळे शेतकर्यांचा माल खराब झाला असल्याने पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. पावसामुळे कोथिंबिरीचेही मोठे नुकसान झाले असून बाजारात एका जुडीला 100 ते 150 रुपये भाव मिळत आहे. गेल्या १५ दिवसांपर्यंत भाज्यांचे भाव स्थिर होते, मात्र, या आठवड्यापासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र पालेभाज्याची आवक घटली आहे. याचा मोठा परिणाम भाजीपाल्यांच्या किंमतीवर दिसून येत आहे. तर, भाज्यांच्या किमती वाढल्यामुळे सामान्य माणसाच्या घरातून पालेभाज्या गायब होत आहेत.
हेही वाचा - नाशिकवर पसरली धुक्याची चादर; गुलाबी थंडीची चाहूल
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले होते. यात सर्वाधिक नुकसान भेंडी, टोमॅटो, मेथी, शेपू, कोथिंबीर आदी भाज्या सडून गेल्याने झाले आहे. यातच भाव वधारल्याने ग्राहकांनी देखील ह्या पालेभाज्यांकडे पाठ फिरवली आहे. तर भेंडी, चवळीच्या शेंगा, वांगी, दुधी भोपळा, गवार, दोडका, कोबी, फ्लॉवर यांचे दर कायम असल्याने ग्राहक ह्या भाज्यांना जास्त पसंती देत आहे.
कुठल्या पालेभाज्यांचे दर वाढले
कोथिंबीर - 100 ते 150 रुपये जुडी
शेपू - 30 ते 35 रुपये जुडी
पालक - 30 ते 35 रुपये जुडी
मेथी - 30 ते 40 रुपये जुडी
कांदापात - 40 ते 50 रुपये जुडी
हेही वाचा - दिंडोरी तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटूबांला आठवलेंकडून एक लाखाची मदत