नाशिक - भारतात एकूण 13 प्रमुख आखाडे असून यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील 'श्री पंचायती आखाडा आनंद सन्यासी' हा एक आखाडा अत्यंत प्राचीन संस्था म्हणून ओळखला जातो. या संस्थानचे प्रमुख स्थान कपिलधार पंचकोशी तीर्थ येथे आहे. भारतात हिंदू धर्माचा प्रचार प्रसार व्हावा हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या आखाड्यात विद्यार्थ्यांना आध्यत्मिक शिक्षण दिले जाते.
श्री पंचायती आखाडा आनंद सन्यासीचे 'सूर्यनारायण' हे दैवत आहे. आखाड्यात युद्ध करण्याची शक्ती आणि मनोबल सूर्य देवता देते अशी मान्यता असून हिंदू धर्माची रक्षा या आखाड्याचा मुख्य उद्देश आहे. या आखाड्यात अनेक प्रसिद्ध महात्मा झाले असून त्यांनी अनेक अदभुत चमत्कार केल्याचे सांगितले जाते. महंत शिवरमपुरी जी, महंत नारायणगिरी जी, यांच्यासारख्या अनेक महंतांनी हा आखाडा उभा करण्यासाठी कार्य केले आहे. सुरुवातीला या आखाड्याचे अध्यक्षपद हे श्री महंत रामनारायण गिरी यांच्याकडे होते. त्यानंतर सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वर येथील श्री महंत सागरानंद सरस्वती हे अध्यक्ष म्हणून आखड्याची जबाबदारी सांभाळत आहेत.
श्री पंचायती आखाडा आनंद सन्यासी संस्थेचे कार्य..
- नागा साधूंची ही प्राचीन संस्था आहे..
- हिंदू धर्म ,भारतीय संस्कृती,वाङ्मयम्य तसेच साधूंच्या धर्माची रक्षा करणे आणि देश विदेशात जाऊन हिंदू धर्मचा प्रचार प्रसार करणे..
- कुंभमेळा आणि धार्मिक कार्यक्रमात येणाऱ्या साधू महंत, ब्रम्हचारी आदींची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे..
- प्राचीन नियमानुसार श्री रमता पंच चे धर्म प्रचारार्थ आणि जगाच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हिंदू धर्मचा प्रचार प्रसार करणे..
विद्यार्थ्यांना दिले जातात अध्यात्मिक धडे -
त्र्यंबकेश्वर येथील श्री पंचायती आखाडा आनंद सन्यासी संस्थेची भव्य इमारत असून इथे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत आध्यत्मिक शिक्षण दिले जाते. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आध्यत्मिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. या आखाड्यात विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संस्था करते. सकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांची दिनचर्या सुरू होते. सहा वाजता महाआरती केली जाते. सात वाजता विद्यार्थ्यी शाळेत जातात. त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना अध्यात्मिक शिक्षण दिले जाते. त्यामध्ये भगवतगीता, प्रवचन, कीर्तन आणि सामुदायिक हरिपाठाचा समावेश असतो. त्यानंतर शरीर स्वस्थासाठी योगा, प्राणायामाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. तसचे रात्री आठ वाजताच्या जेवणानंतर विद्यार्थांकडून शालेय अभ्यास करवून घेतला जातो.