नाशिक- गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्याच्या काही भागांमध्ये कमबॅक केले आहे. कळवण, सटाणा, दिडोरी सिन्नरच्या पूर्व पट्ट्यासह मनमाडमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. नाशिक शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
दिवसभराच्या उकाड्यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार सुरू झाल्याने घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. सीबीएस, त्र्यंबक नाका, गंगापूर रोड, कॅालेज रोड, मखमलाबाद, मेरी, म्हसरूळ या परिसरात सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशीरापर्यंत सुरू होता. जिल्ह्यातील काही भागातही शुक्रवारी पावसाला सुरूवात झाली. कळवण, चांदवड, दिंडोरी, मनमाड, निफाड आणि सिन्नरच्या पूर्व भागातही दमदार पाऊस झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून या परिसरातील दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
कळवण शहर व परिसरात परतलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. पीकपेरणी शिल्लक असलेल्या काही ठिकाणी पेरणी करण्याची संधी मिळणार आहे. पावसाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवणमध्ये गेल्या महिन्यापासून पाऊस नव्हता. यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसायला सुरुवात झाली होती. यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ठिकठिकाणी पावसाळा साकडे घालण्यासाठी होमहवन पूजा, धोंड्या धोंड्या पाणी देचा जागर, सामूहिक नमाज पठण असे उपक्रम राबवून पावसाची विनवणी करण्यात येत होती.