नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले असून परिस्थिती पाहता लॉकडाऊनचा काळ वाढवण्यात येत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले परराज्यातील अनेक मजूर गावी जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. येवल्यातदेखील अडकून पडलेल्या शेकडो परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
देशभरात झालेल्या लॉकडाऊनदरम्यान येवला तालुक्यात बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यातील अडकलेले परप्रांतीय मजूर वास्तव्यास होते. त्यांना त्यांच्या राज्यात जाण्याकरता एसटी महामंडळाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व नागरिकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येऊन त्यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात येणार आहे. मध्य प्रदेशमधील मजुरांना सेंधवा बॉर्डर येथे सोडण्यात येणार असून सर्व बसेस रवाना झाल्या आहेत. तर, रेल्वेने मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या मजुरांकरता स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. सोबतच, बसद्वारे प्रवास करणाऱ्या सर्व मजुरांसाठी नाश्ता व पाण्याची व्यवस्थाही करून देण्यात आली आहे.