नाशिक - मागील दीड ते दोन दशकापासून निसर्ग बळीराजाचे सत्वपरीक्षा घेत आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळाची रणरण अशा नैसर्गिक आपत्तीबरोबरच मानवनिर्मित संकटाने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच कर्जाचा डोंगर उभा ठाकल्याने हे ओझे माथ्यावर वागवीत कित्येक जणांनी जीवनाची शोकांतिका करून घेतली. अशावेळी शासनानेही या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करत असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.
सरकारकडून कर्जमाफीसारख्या मोठ्या घोषणांचा सुकाळ झाला. परंतु, कर्जमाफीचे हे कागदी घोडे प्रशासकीय पातळीवरच अडकल्याने अनेकजण या योजनेपासून वंचित राहिले. परिणामी बळीराजा कर्जाच्या ओझ्याने आणखी खोलात जात असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यामधून उमटत आहेत.
नाशिकच्या महिरावणी गावातील तुकाराम खांडबहाले येथील एक अल्पभूधारक शेतकऱ्याची याठिकाणी वडिलोपार्जित २ एकर शेती आहे. त्यावर ते आपल्या प्रपंचाचा गाडा हाकत आहेत. मात्र, मागील ३ ते ४ वर्षांपासून निसर्गाने अवकृपा दाखवल्याने त्यांच्यावर घेतलेल्या बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत गेला. कर्जाची परतफेड न केल्याने नवीन कर्जासाठी बँका उभे देखील राहू देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर पुढील लागवडीसाठी लागणाऱ्या भांडवलाचा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. हा प्रश्न एकट्या तुकाराम या शेतकऱ्याचा नसून नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जबाजारीपणाच्या संकटात सापडले आहेत.
बँकाही आर्थिक संकटात
शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी नाशिक जिल्हा सहकारी बँकसुद्धा कर्जवसुली होत नसल्याने आर्थिक संकटात सापडली आहे. आजमितीला या बँकेत १ हजार ५७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. सरकारने घोषणा केल्यानंतर कर्जमाफी होईल ही एक आशा शेतकऱ्यांना आहे.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करतात. याचे अपयश हे शासकीय धोरणाला जाते, हे सत्य नाकारता येणार नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. नैसर्गिक आपत्तीसोबत वरूण राजानेही दांडी मारल्याने शेतकरी स्वतःलाच कर्मदरिद्री म्हणून घेत आहे. मागील दीड वर्षात नाशिक जिल्ह्यात कर्जाच्या डोंगराखाली दबून १५० शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. ही शोकांतिका आहे.
कर्जाच्या संकटातून स्वतः सहपरिवाराला सावरायचे कसे ? असा सवाल शेतकऱ्यांपुढे उभा आहे. लोकसभेत प्रबळ विधेयक नसल्याने केवळ बोलघेवड्या छबीला भुलून शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांची पाठराखण केली. मात्र, त्याची जाणीवही सरकारला नाही. योजना फक्त जाहीर होत आहेत. पण शेतकऱ्यांची अवस्था मात्र अश्वत्थामासारखी झाली. हे सत्य मात्र नाकारता येणार नाही.
२०१७-१८ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी
- तालुका संख्या
- नाशिक ०६
- बागलाण ०५
- चांदवड २०
- सिन्नर ०३
- देवळा ०८
- दिंडोरी १६
- इगतपुरी ०१
- कळवण ०१
- मालेगांव १७
- नांदगाव ११
- निफाड १५
- त्र्यंबकेश्वर ०४
- येवला ०३
- एकूण १०८