नंदुरबार - लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सोमवारी पार पडला. राज्यातील शेवटच्या टप्प्यात १७ मतदारसंघामध्ये मतदान झाले. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनपाडा मतदान केंद्रांवर सोमवारी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते. सकाळी तांत्रिक बिघाडामुळे मतदान उशिरा सुरू झाले होते.
एक हजारांपेक्षा जास्त मतदार असलेल्या सोनपाडा मतदान केंद्रांवर ६ वाजेनंतरही मतदान सुरू होते. सोनपाडा मतदान केंद्रात एकूण ११५४ मतदारांपैकी १०३१ मतदारांनी आपला हक्क बजावला. ३०८ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सकाळी तांत्रिक बिघाडमुळे मतदान उशिरा सुरू झाले. त्यामुळे संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मतदान पूर्ण करण्यात आले. बर्डीपाडा केंद्रावर ११४७ पैकी ९८४ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. व्हीव्हीपॅट मशीनमुळे मतदान करण्यासाठी वेळ लागत होता.