नंदुरबार - नवापुर तालुक्यातील हजारोच्या संख्येने बाहेरील राज्यात आणि महानगरात अडकलेले कामगार, मजूर, विद्यार्थ्यांचे लाॅकडाऊन दरम्यान खाण्यापिण्याचे हाल होत होते. त्यांच्याकडील पैसाही संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांना सदर ठिकाणाहून घरी येण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध होत नव्हती. अखेर त्यांनी नवापूरचे आमदार आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या सर्वांची घरी येण्यासाठी व्यवस्था करण्यात आली.
हेही वाचा....गुजरात सरकार आपल्या नागरिकांना स्वीकारत नाही हे दुर्दैवी : बाळासाहेब थोरात
नंदुरबार जिल्हा प्रशासन, आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी आणि नवापूर मतदारसंघाचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या मध्यस्थीने गुजरात राज्यातील वापी येथील वेलसन कंपनीत काम करणाऱ्या शेकडो आदिवासी युवतींना स्वगावी आणण्यात आले आहे. यातील पहिली बस आली असून उर्वरित बसेस आज (शनिवार) सायंकाळपर्यंत येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. घरी परतलेल्या मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आमदार शिरिषकुमार नाईक आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, नंदुरबार जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.
नवापूर शहरातील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात पहाटे पाचच्या सुमारास पहिली बस दाखल झाली. यानंतर बसमधील सर्व मुलींची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारुन चौदा दिवस घरीच राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला. सकाळी विद्यालयातून पालकांनी मुलींना आपल्या घरी नेले. यावेळी आमदार शिरिषकुमार नाईक यांनी सर्व मुलींना चौदा दिवस बाहेर न निघता घरातच राहण्याचा सल्ला दिला. कोणीही बाहेरगावी असल्यास त्यांनाही आणण्याचे नियोजन आदिवासी विभाग, नंदुरबार जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासनाने केले आहे. त्यांनाही लवकर आणण्यात येईल असे आमदार नाईक यांनी सांगितले.