नंदुरबार - वस्तीशाळा शिक्षकांना प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी वस्तीशाळा शिक्षकांनी नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार या शिक्षकांना सामावून घेणे आवश्यक आहे. मात्र, जिल्हा परिषदेने या शिक्षकांच्या संदर्भात उदासीन धोरण कायम ठेवले आहे. ३१ जुलै २०१८ रोजी शिक्षकांकडून मूळ कागदपत्रे घेऊनही त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. तसेच मागणीनुसार एप्रिल २०१३ साली शिक्षण परिषदेच्या ७२ स्वयंसेवकांना बिंदू नियमावलीप्रमाणे स्थानिक क्षेत्रात सेवेत सामावून घेण्याची सूचनाही करण्यात आली. मात्र, तरीही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. जिल्हा परिषद प्रशासनाने अनेक वेळा आश्वासने दिली पण सेवेत समाविष्ट करून घेतले नाही. त्यामुळे या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.