नंदुरबार - मागील तीन वर्षापासून शेतातून कुठल्या प्रकारचे उत्पन्न निघत नसल्याने, त्याचबरोबर शेतात बियाणे व फवारणीसाठी उचललेल्या कर्जाचा बोजा वाढत असल्याने, नैराश्यासह कर्ज बाजारीपणाला कंटाळून शेतकर्याने आपल्या शेतात फवारणीचे औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथील सदाशिव ओंकार पाटील (वय 44) यांनी तीन एकर शेतात कपाशीची लागवड केली. संततधार झालेल्या पावसातून कपाशी काही प्रमाणात वाचविली. मात्र, अवकाळी पाऊस झाल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होणार असल्याचे दिसून आल्यानंतर सदाशिव पाटील हे खचून गेले होते. तीन वर्षापूर्वी मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज त्याचबरोबर शेतातून पाहिजे तेवढे उत्पन्न निघणार नाही. त्याचबरोबर कर्जाचे डोंगर वाढतच राहणार आहे. कापूस पिकातून पाहिजे तेवढे उत्पन्न निघणार नसल्याचे त्यांना दिसून आले. त्या नैराश्यासह कर्ज बाजारीपणा कंटाळून सदाशिव ओंकार पाटील यांनी कपाशीवर फवारणीचे औषध प्राशन करुन आत्महत्या केली.
शेतात काम करणाऱ्या मजुरांना ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. त्यांच्यावर असाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली व दोन मुले असा परिवार आहे. याबाबत नारायण ओंकार पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या, जमावाकडून आरोपीच्या घरावर दगडफेक
हेही वाचा - कोंडाईबारी घाट अपघात- सात तास दोन मृतदेहाजवळ अडकला होता प्रवासी