नंदुरबार - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने 15 एप्रिलपर्यंत संचारबंदी जारी केली आहे. यात सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेत असलेल्या तसेच नाशवंत वस्तू व किराणा दुकान सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेत व नाशवंत वस्तुत नसणाऱ्या दुकानदारांनी आपले व्यवसाय सुरू ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने नगरपालिका प्रशासन व तहसीलदार यांनी शहरातील सुमारे 15 ते 20 दुकाने 15 एप्रिल पर्यंत सील केली आहेत.
जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -
नंदुरबार जिल्ह्यात कोविड-19 विषाणू बाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी सकाळी 6 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले असून जनता कर्फ्युला स्वत:हून प्रतिसाद देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
नंदुरबारमध्ये १५ एप्रिलपर्यंत संचारबंदी ही व्यवस्थापने सुरू राहतील -या कालावधीत सर्व बाजारापेठा, आठवडे बाजार व इतर दुकाने बंद राहतील. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीची दुकाने, गॅस वितरण सुविधा पूर्णवेळ सुरू राहतील.
अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच पेट्रोल मिळणार -
जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या वाहनासाठी पेट्रोलपंप सुरू राहतील, अन्य वापरासाठी प्रतिबंध असेल. वैद्यकीय कारणास्तव नागरिकांना बाहेर पडण्याची मुभा असेल, मात्र त्यांच्यासोबत सबळ पुरावे असणे आवश्यक आहे.
तीन दिवस दुकाने सुरू ठेवण्याची मुभा -
आठवड्यातील सोमवार, मंगळवार व बुधवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, आस्थापना (किरणा दूध, फळे, भाजीपाला विक्री) पूर्वी दिलेल्या आदेशानुसार सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असेल. वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना पूर्णवेळ सुरू राहतील. आरोग्य, महावितरण तसेच इतर अत्यावश्यक सेवा देणारी कार्यालये वगळता इतर सर्व शासकीय कार्यालये आणि बँक 50 टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे.
तहसिलदारांनी केली कारवाई -
जिल्हा प्रशासनाने आदेशित केल्याप्रमाणे अत्यावश्यक सेवा तसेच नाशवंत वस्तू व कृषिपूरक वस्तूंची व्यवस्थापनाने सुरू ठेवावीत असे आदेशित केले आहे. मात्र आदेशात नसलेली व्यवस्थापने देखील सुरू असल्याने व त्या व्यवस्थापनांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून आले असल्याने नगरपालिका प्रशासन व तहसीलदार यांच्या वतीने सदर दुकाने सील करण्यात आली आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे असे देखील आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.