नंदुरबार - दुर्गम भागात रुग्णांसाठी आतापर्यंत बांबू अॅम्बुलन्सचा वापर केला जात होता. त्यामुळे, अनेकांना दवाखान्यापर्यंत पोहचण्यास उशीर झाल्यामुळे अनेकांनी जीव देखील गमावला आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागांतील रुग्णांना सेवा देण्यासाठी बाईक अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली. 23 दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते बाईक ॲम्बुलन्सचे लोकार्पणही झाले, मात्र ते अद्यापही धुळखात पडून आहेत.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये बनवाट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
बाईक ॲम्बुलन्स पडल्या धूळखात
निती आयोगाच्या पैशातून जिल्हा प्रशासनाने ६६ लाख रुपये खर्चून १० बाईक ॲम्बुलन्स खरेदी केल्या होत्या. दोन वर्षे अतिदुर्गम भागांत या बाईक ॲम्बुलन्स ठेकेदारांमार्फतच चालवल्या जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी. पाडवी यांच्या हस्ते या बाईक रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. मात्र,, तेव्हापासूनच त्या ठेकेदारांच्या दारात धुळ खात पडून आहेत. या बाईक ॲम्बुलन्सच्या चालकांचे प्रशिक्षण आरोग्य विभागाकडून झाले नव्हते, सोबतच त्यांच्या नियोजित जागा देखील निश्चित झाल्या नसल्यानेच त्या उभ्या असल्याचे पुरवठादाराकडून सांगण्यात आले.
दीड महिना केली प्रतिक्षा
लोकार्पणा आधीही या बाईक ॲम्बुलन्स तब्बल दिड ते दोन महिने आरटीओची पासिंग झाली नसल्याने उभ्या होत्या. आता पुन्हा तसाच काहीसा प्रकार होत असल्याने रुग्णसेवेसाठी लाखो रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या या बाईक ॲम्बुलन्स उभ्याच राहणार असतील तर मग ठेकेदारांच्या फायद्यासाठीच ही सर्व खटाटोप आहे का? असा काहीसा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा - खासदार संजय राऊत