नांदेड - किनवट पैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेलेला वीस वर्षीय युवक अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यांत वाहून गेला. ही घटना सोमवारी (२ सप्टेंबर) किनवट शहराला लागून असलेल्या पैनगंगा नदीवर घडली. त्याचा शोध स्थानिक मच्छीमार घेत आहेत. हरतालिका विसर्जनासाठी २५ महिला गेल्या होत्या. मात्र, त्या वाचल्या आहेत.
किनवट शहरात सर्वत्र गणपतीच्या स्थापनेची लगबग सुरू होती. यातच शहरातील इस्लामपुरा भागात राहणारा शेख सोहेल शेख बाबा हा तरूण (वय.२०) आंघोळीसाठी गेला होता. दुपारी १ च्या सुमारास पैनगंगेला अचानक आलेल्या पुरामुळे तो वाहून गेला. मित्रांनी त्याला बचावासाठी आरडा-ओरड केली. मात्र, त्याला वाचविणारे कोणी नसल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही. या घटनेची माहिती सोहेलच्या वडलांना समजताच ते पैनगंगा तिरी आले. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन मच्छीमारांना बोलावून सोहेलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. शेख सोहेल हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असून त्यास पाच बहिणी आहेत. सोहेल पुरात वाहून गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.