नांदेड - केंद्र सरकारच्या बहुचर्चित 'उज्ज्वला' योजनेच्या माध्यमातून अनेकांना गॅस जोडणी देण्यात आली. मात्र, दिवसेंदिवस सिलेंडरची वाढती किंमत ही उज्ज्वला गॅस जोडणी घेणाऱ्यांसाठी न परवडणारी ठरत असल्याने ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीकडे वळावे लागत आहे. सिलेंडरकरीता महिन्याकाठी ८०० ते ९०० रुपयांचा खर्च करणे परवडत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याकडे महिलांचा भर आहे.
केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू केली. समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत गॅस पोचवण्याची योजना सरकारने आखली. उज्ज्वला कुटुंबीयांना मोफत गॅस सिलेंडर आणि शेगडी देण्यात आली. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस जोडणी मिळाली. नांदेड जिल्ह्यामध्ये उज्ज्वला गॅस योजनेचे दोन लाख १० हजार लाभार्थी आहेत. परंतु, सिलेंडरमधील गॅस संपल्यावर नवीन सिलेंडर घेण्यासाठी या लाभार्थ्यांकडे पैसे नाहीत. स्वयंपाकासाठी इंधन म्हणून लाकडाचा होणारा वापर कमी करणे, जंगलतोड थांबावी, चुलीवर स्वयंपाक करताना महिलांना होणारा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती.
या कुटुंबांना मोफत गॅस जोडणी देण्यात आली. घरात गॅस आल्याने गरीब कुटुंबातील महिलांना आनंद झाला. परंतु, आता दिवसेंदिवस गॅस सिलेंडरच्या दरामध्ये होत असलेल्या वाढीमुळे त्यांच्या आनंदावर विरजन पडले असून नवीन गॅस सिलेंडर घेण्यासाठी ८५० ते ९०० रुपये मोजणे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, अल्पभूधारक, मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या कुटुंबांना शक्य होत नाही.
असे वाढलेत दर
महिना | दर (रुपये) |
जानेवारी २०२० | ५९५ |
फेब्रुवारी २०२० | ६२० |
मार्च २०२० | ६८० |
जानेवारी २०२१ | ७४५ |
फेब्रुवारी २०२१ | ७९५ |
मार्च २०२१ | ८५५ |