नांदेड - उद्धव ठाकरे अलीकडच्या काळात मवाळ झाले आहेत. त्यांना आता मवाळ झाल्याशिवाय पर्याय नाही. शिवसेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला आहे. असा टोला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. तसेच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत फार दिवस टिकणार नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत यावे असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
तिसऱ्या पक्षाचे प्रकरणही लवकरच बाहेर येईल
राज्य सरकार तीन पक्षाचे आहे, सध्या दोन पक्षातील प्रकरण बाहेर आली आहेत. तिसऱ्या पक्षातील प्रकरण देखील लवकरच बाहेर येईल. असा दावा मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केला आहे. संजय राठोड आणि धनंजय मुंडे प्रकरणावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
आंतरजातीय विवाहामध्ये वाढ होण्याची गरज
जातीव्यवस्था कमी करायची असेल तर आंतरजातीय विवाहामध्ये वाढ करणे आवश्यक आहे. मी स्वतःही एका ब्राम्हण समाजाच्या मुलीशी विवाह केला आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित दाम्पत्यास सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक लाखाची मदत करण्यात येते असे देखील ते यावेळी म्हणाले.