नांदेड - समन्वय आणि नियोजन केले तर काय होऊ शकते, हे नांदेड आणि हिंगोली येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपआपसात समन्वय साधून नांदेड-हिंगोलीची २८० टन हळद बांगलादेशला निर्यात केली आहे.
नांदेड आणि हिंगोलीमधील शेतकरी कंपन्यांनी शेतात पिकवलेला माल बाजारपेठेत विकण्यास सुरुवात केली. मालेगाव येथील प्रल्हाद इंगोले यांच्या शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीने १५० टन बांगलादेशला निर्यात केली आहे. तर हिंगोली येथील प्रल्हाद बोरगड यांच्या सुर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीने १३० टन बांगलादेशला निर्यात केली आहे. अशी एकूण २८० टन हळद विलास शिंदे यांच्या सह्याद्री फार्म नाशिक या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून निर्यात करण्यात आली आहे.
उत्तर नांदेडचे आमदार बालाजीराव कल्याणकर व जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी हळद घेऊन जाणार्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवली. भगवान इंगोले यांनी सेंद्रीय हळद देऊन उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना प्रल्हाद इंगोले म्हणाले की, सरकारच्या सहकार्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांना जगाच्या बाजारपेठेत नेण्यास मदत होत आहे.
शेतकऱ्यांनी सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा-
नांदेडची हळद या अगोदरही अनेक ठिकाणी गेली. परंतु ती केवळ व्यापाऱ्यांनी पाठवली होती. परंतु यावेळेस सरकारच्या धोरणानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पिकवलेला माल विकण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पहिल्यांदा थेट शेतकऱ्यांनी शेतमाल जगाच्या बाजारपेठेत विकायला सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना आमदार बालाजीराव कल्याणकर म्हणाले की, शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार हे व्यापारी व शेतकरी दोघांच्याही सोबत राहणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
मधुकर देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, शेतकरी उत्पादक कंपनीमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत मिळत आहे. यावेळी आयकर अधिकारी एकनाथराव पावडे, तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पवार, व्यापारी असोसिएशनचे बद्रीनारायण मंत्री, प्रवीण कासलीवाल, विजय गोयंका, आनंद धुत, बालाजी पाटील भायेगावकर, विठ्ठल देशमुख व मधुकर देशमुख उपस्थित होते.